पालघर : साहित्यविषयक रुची व ज्ञान वाढीस लागावे आणि आपली बोली भाषा जतन व्हावी म्हणून वसई येथील शब्दांगण प्रस्तुत ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’ या उपक्रमाचा २४वा प्रयोग पालघर येथील मासवण आश्रमशाळेत झाला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मराठी भाषा व महत्त्व यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शाळेतील शिक्षकही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मासवण गावातील सरपंच आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चहाडे गावातील साहित्याची आवड असलेले कवी भालचंद्र पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वलिखित कविता सादर केल्या.
या कार्यक्रमादरम्यान कविता, खेळ, गप्पा, प्रश्नोत्तरे, गद्य-पद्य, नाट्यावलोकन, लोकगीत असा निखळ व मनमोकळा ‘शब्दांचा शब्दांशी संवाद’ विद्यार्थ्यांशी साधण्यात आला. कवयित्री शीतल संखे, श्वेता म्हात्रे, अनुजा संखे, संध्या सोंडे, शिल्पा परुळेकर, अक्षता देशपांडे, पूजा सावंत, कवी संजय पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. या वेळी मुख्याध्यापक श्री. पवार, शिक्षक उपस्थित होते.